राज्यात महिला तरुणी सुरक्षित नाहीत, ठराविक मुद्द्यावरच निवडणूका होतात – राज ठाकरे
मंगळवेढ्याच्या सभेत राज ठाकरेंनी उपस्थित केला मुद्दा

संपादक – दिनेश खंडेलवाल
राज्यात महिला तरुणी सुरक्षित नाहीत, ठराविक मुद्द्यावरच निवडणूका होतात – राज ठाकरे
मंगळवेढ्याच्या सभेत राज ठाकरेंनी उपस्थित केला मुद्दा
पंढरपूर(प्रतिनिधी):- राज्यात गेल्या अनेक वर्षापासून निवडणुका आले की ठराविक मुद्द्यावरच निवडणुका होतात. सध्याच्या स्थितीत राज्यांमध्ये महिला तरुणी सुरक्षित नाहीत. याबाबत सरकारने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे असे परखड मत मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांच्या प्रचारासाठी मंगळवेढा येथे आले असता राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
हजारोंच्या जनसमुदायासमोर बोलताना राज ठाकरे पुढे म्हणाले की तुम्ही ज्यांना आमदार खासदार केले. त्यांनी काहीच केले नाही. त्यामुळे ही विदारक परिस्थिती सध्या राज्यामध्ये निर्माण झाली आहे. आमदार, खासदारांची घरे पुणे, मुंबईला असून केवळ निवडणुकांपुरते लोकांत मिसळतात. एकीकडे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. महिला, तरुणी सुरक्षित नाहीत. गेल्या साठवर्षांपासून ठराविक मुद्द्यांवरच निवडणुका लढवून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केली जाते आहे.
त्याचा जाब विचारणे गरजेचे होते. परंतु तुम्ही त्यांना जाब विचारला नसल्याने तुमची अशी अवस्था झाली आहे, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली. लाडकी बहीण योजनेत पैसे देऊन इतर महागाईच्या माध्यमातून जनतेकडून पैसे काढून घेण्याचे काम सुरू आहे. लाडकी बहीण योजना देताना लाडका भाऊ आठवला नाही का, असा प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर कित्येक वेळा विधानसभा निवडणुका होऊनदेखील अद्यापही मंगळवेढा तालुका दुष्काळी तालुका म्हणून गणला जातो. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आजपर्यंत ज्यांना निवडून दिले आहे, त्यांनी फसवले आहे. रोजगार निर्मिती नसल्याने ग्रामीण भागातील तरुणांचे लोंढे शहराकडे जात आहेत. ज्या लोकांना तुम्ही निवडून दिले त्यांनी रोजगाराची कामे केली नाहीत त्यामुळे ही वेळ आज सर्वांसमोर उभी राहिलेली दिसून येते.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील मनसेचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांच्या रेल्वे इंजिन चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून विधानसभेत पाठवण्याचे आवाहन यावेळी त्यांनी मतदारांना तसेच उपस्थित जनसमुदायासमोर केले.