ईतरराज्य

चंद्रभागेला पूर सदृश्य परिस्थिती २०० कुटुंबाचे स्थलांतर;सर्व मंदिरे पाण्याखाली

भीमा नदीत १ लाख ४६ हजाराचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी

संपादक – दिनेश खंडेलवाल 

चंद्रभागेला पूर सदृश्य परिस्थिती २०० कुटुंबाचे स्थलांतर;सर्व मंदिरे पाण्याखाली

भीमा नदीत १ लाख ४६ हजाराचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी

पंढरपूर(प्रतिनिधी):- राज्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सर्वत्र होत असल्याने धरण क्षेत्रातही पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने सध्या नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. चंद्रभागा नदीलाही पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून शहरातील व्यास नारायण झोपडपट्टीमधील सुमारे २०० कुटुंबांना स्थलांतरित करण्याचे काम नगरपरिषद, महसूल व महावितरण यांच्यामार्फत करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग भीमा नदीत सोडत असल्यामुळे चंद्रभागेच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे चंद्रभागेत पाण्याची पातळी वाढणार आहे. चंद्रभागेच्या पत्रामध्ये स्नानासाठी, कपडे धुण्यासाठी नागरिक, भाविकांनी जाऊ नये असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.

उजनी व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी उजनी धरणातून ९१ हजार ६०० क्यूसेक्स तर वीर धरणातून ५४ हजार ७६० क्यूसेक्स असा एकूण १ लाख ४६ हजार ३६० क्यूसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी केले आहे.

आज दुपारी तीन वाजता संगम येथून १ लाख २० हजार ६९५ क्सूसेक्सने पाणी वाहत आहे. तर चंद्रभागा नदी पात्रातून ६० हजार २४७ क्सूसेक्सने पाणी वाहत आहे. उजनी व वीर धरण घाटमाथ्यावरील पावसाच्या प्रमाणानुसार व धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवक नुसार विसर्गामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने, नदीपात्रालगत पूरस्थिती निर्माण होवून सखल भागातील नागरी वस्तीमध्ये पूराचे पाणी शिरण्याची शक्यता आहे. तसेच पाणी पातळी वाढत असल्याने पंढरपूर तालुक्यातील ८ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने नीरा व भीमा नदी काठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी.

भीमा व नीरा नदीमधून मोठ्या पाण्याचा विसर्ग सुरु झालेला आहे त्यामुळे नदीतील कोल्हापूर पद्धतीचे सर्वच बंधारे पाण्याखाली जाणार आहेत. बंधारे पाण्याखाली गेलेल्यावर बॅरेकेट लावून वाहतुकीसाठी बंद करावेत. अशा सूचना तलाठी, ग्रामसेवक,पोलीस पाटील यांना दिलेल्या आहेत.

नगरपालिका प्रशासन सज्ज….

उजनी व वीर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी भीमा नदीला उजनीतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु झालेला आहे. त्यामुळे शहरातील चंद्रभागा नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सुरक्षेबाबत दक्षता घ्यावी तसेच पूर परिस्थितीत आवश्यक उपाययोजना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

नदीपात्राच्या शेजारी असलेल्या व्यास नारायण झोपडपट्टीची संपूर्ण पाहणी करून तेथील २०० कुटुंबांना स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासोबत महसूल प्रशासनचे राजेंद्र वाघमारे,
महावितरण, नगरपरिषदेचे कर्मचारीही उपस्थित होते.

तसेच नगरपालिका प्रशासनामार्फत उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथील रायगड भवन येथे एक हजार नागरिकांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बाधित होणाऱ्या नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तू नेण्यासाठी नगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून. स्थलांतरित करण्यात येणाऱ्या नागरिकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व स्वयंसेवी संस्थेमार्फत भोजन व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close