
संपादक – दिनेश खंडेलवाल
शासकीय धान्य गोदामातील कामगारांचे थकीत पगार मिळणार
आ.अभिजीत पाटलांनी उठविला आवाज;कामगार मंत्र्यांकडून आश्वासन
पंढरपूर(प्रतिनिधी):- सोलापूर जिल्ह्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय धान्य गोदामातील हमाल कामगारांचे पगार कित्येक वर्षापासून थकीत आहेत. ते पगार लवकरात लवकर करण्यासाठी प्रश्नोत्तरच्या कालावधीत विधानभवनात शासकीय धान्य गोदामातील कामगारांचे पगार कधी मिळणार यावर आमदार अभिजीत पाटील यांनी प्रश्न उपस्थित करून कामगारांचे पगार लवकर करण्याची मागणी केली.
याविषयी आमदार अभिजीत पाटील यांनी सोलापूर जिल्हा धान्य गोदामातील नोंदणीकृत कामगारांचे लेव्हीसह पगार प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेच्या आत माथाडी बोर्डात भरणा करणे आवश्यक आहे. परंतू चालू पगार जानेवारी २०२५ पासून तर पंतप्रधान मोफत मधील सन २०२१-२२ पासून आतापर्यंत झाले नाहीत. हातावर पोट असणार्या कामगारांना पगार वेळेत न झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे विधानभवनामध्ये आमदार अभिजित पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या सत्रात कामगारांचे पगार कधी मिळणार यावर प्रश्न उपस्थित करून मंत्री महोदयांनी लवकरात लवकर त्यांचे पगार करावेत अशी मागणी केली.
आमदार अभिजीत पाटील यांनी शासकीय धान्य गोदामातील हमाल कामगारांच्या थकीत पगाराबद्दल प्रश्न उपस्थित केल्याबद्दल आ.अभिजीत पाटील यांचे महाराष्ट्र राज्य हमाल-मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ.बाबा आढाव, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे तसेच सर्व शासकीय धान्य गोदामातील कामगारांनी अभिनंदन केले आहे.
याबाबत बोलताना कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी हा प्रश्न व्यापक असून संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय धान्यगोदामातील कामगारांचा आहे. आमदार अभिजीत पाटील यांनी मांडलेला हा प्रश्न अत्यंत ज्वलंत आहे. राज्यातील अनेक शासकीय धान्य गोदामातील कामगारांचे पगार देणे बाकी आहे. या संदर्भात पुरवठा विभागातील अधिकार्यांची बैठक घेवून लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. ]