ईतर

शेतकर्यांची शेकडो वर्षांची परंपरा वेळ अमावस्या;वाचा काय आहे ही परंपरा?

शेतातील काळ्या आईचं ऋण फेडण्यासाठी तिची मनोभावे पूजा कशी केली जाते!

संपादक-दिनेश खंडेलवाल

शेतकर्यांची शेकडो वर्षांची परंपरा वेळ अमावस्या;वाचा काय आहे ही परंपरा?

शेतातील काळ्या आईचं ऋण फेडण्यासाठी तिची मनोभावे पूजा कशी केली जाते!

पंढरपूर : भारत हा आपला
कृषीप्रधान देश आहे. कृषीशी निगडित अनेक सणवार उत्सव देशातील विविध राज्यात साजरे केले जातात. असाच एक सण म्हणजे वेळ अमावस्या आहे. याला येळवस अमावस्या असंही म्हणतात. हा सण शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. शेतातील काळ्या आईचं ऋण फेडण्यासाठी आज तिची मनोभावे पूजा केली जाते. गावातील सर्वजण आज शेतात वनभोजनाचा आनंद लुटतात. वेळ अमावस्या साजरी करण्याची शेकडो वर्षापासूनची परंपरा सोलापूर,लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याच्या भागात आजही पाळली जाते. कोणत्याही पुरानात किंवा इतिहासात नसलेला मात्र शेकडो वर्ष जुना सण म्हणजे वेळ अमावस्या.

जिल्हा प्रशासनाकडून एक दिवस सुट्टी———

हा सण सोलापूर,लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याच्या काही भागात साजरा केला जातो. दरवर्षी या सणाची घराघरात जय्यत तयारी सुरु असते. तुरीच्या शेंगा, चवळी, भुईमूग हा सगळा रानमेवा. हरभरे पिठात कालवून चिंच आणि अंबिवलेल्या ताकाच्या पाण्यात शिजवलेली भज्जी, भाकरी, गव्हाची खीर केली जाते. 20 ते 25 लोक जेवतील एवढा स्वयंपाक वाजत गाजत घरातून डोक्यावर घेऊन शेतात जातात. तिथे शेताची पुजा केली जाते. त्यानंतर सर्वजण जेवण करतात. विशेष म्हणजे आजच्या दिवशी जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी दिली जाते.

नेमकी काय आहे परंपरा?

भारतीय व्दिपकल्पात सिंधु संस्कृतीपासून नदीचे जल पुजन करण्याची परंपरा चालत आलेली आहे. गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधु आणि कावेरी या त्या सात नद्या भारतीय लोक परंपरेत अतिशय पवित्र समजल्या जातात. त्यामागे त्यांच्या प्रती असलेली कृतज्ञता होती. त्याच सप्तसिंदु मातृका म्हणून पुजण्याची परंपरा सुरु झाली. पुढे पिण्याच्या पाण्याच्या विहरी खोदल्यानंतर त्यातले जल हे या सप्त सिंधुचे प्रतिक म्हणून पुजले जावू लागले. विहरीच्या जवळ प्रतिकात्मक सात दगड पुजण्याची परंपरा आहे. तिला मराठवाड्यात आसरा म्हणून ओळखले जाते. आसरा म्हणजे तुच आमची राखण करणारी सहारा देणारी ,पाणी पाजणारी याच आसराची पुजा वेळ आमवस्येच्या दिवशी प्रत्येक शेतात ज्वारीच्या कडब्याच्या पेंड्याची कोप करुन भक्ती भावाने केली जाते. आणखी एक परंपरा म्हणजे शेतकऱ्याने आलेल्या पिकातील केवळ अडीच मुठी धान्य कापावे. शेताच्या ईशान्य कोपऱ्यात गंध, फुले, धूप, नैवेद्य यांनी धान्याची पूजा करून मगच धान्य कापावे. असाही एक रिवाज चालत आलेला आहे. संध्याकाळी ज्वारीच्या पेंडीचा टेंबा करुन रब्बीचा गहू, हरभऱ्याच्या वावराला ओवाळून काढायची प्रथा आहे. त्यानंतर तो टेंबा मिरवत जावून गावातील मंदिराच्या समोर टाकायचा. मोठी आग करुन ती शमली की तिच्या राखेतून विस्तव असतानाच ती ठोकरुन घरी जायची परंपरा आहे.

रब्बीचा हंगाम चांगला होऊ दे अशी देवाकडे प्रार्थना केली जाते——–

2022 या वर्षातील आजची शेवटची अमावस्या आहे. पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला हा उत्सव होतो. या दिवशी मातीची लक्ष्मीची मुर्ती तयार केली जाते. गावातील सर्व थोर, लहान शेतात गोळा होत या काळ्या आईची पूजा करतात. तिला गोडाधोडाचा नैवद्य दाखवत आणि वनभोजनाचा आनंद लुटतात. आज शेतातील पांडवांना नवा रंग दिला जातो तसेच रब्बी हंगामातील गहू, हरबरा, ज्वारी, करडई, सुर्यफुल आदी पिकात चर शिंपून रब्बीचा हंगाम चांगला होऊ दे अशी देवाकडे प्रार्थना केली जाते. मूळ कर्नाटकी असणारा हा सण महाराष्ट्रात सोलापूर, उस्मानाबाद,लातूर आणि परळीचा उर्वरित भागात साजरा होतो. मार्गशीर्ष अमावास्येला हा उत्सव साजरा केला जातो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close