देगांवकरांच्यात कसलाही गैरसमज नाही आम्ही अभिजीत पाटलांसोबत आहोत-काका पाटील
एकमुखाने देगावकरांनी दिला अभिजीत पाटलांना आशीर्वाद

संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : “आमच्यात कसलाही गैरसमज नसून आम्ही सर्व गावकरी एका मुखाने अभिजीत पाटील यांच्या पाठीशी उभे असून आता अभिजीत पाटील यांच्या गटाचा विजय निश्चित आहे असे उद्गार देगांव गावचे मा.ग्रामपंचायत सदस्य औदुंबर (काका) पाटील यांनी काल देगांवमध्ये श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी च्या प्रचार सभेत बोलताना काढले. काहीजण आमच्यात गैरसमज व बेबनाव असल्याचा बातम्या पसरवत आहेत मात्र आमच्यात कसलाच गैरसमज नाही आणि सर्व गावकऱ्यांनी आपल्या गावचा सुपुत्र म्हणून अभिजीत पाटलांना साथ द्यावी अशी विनंतीही त्यांनी यावेळी सर्व गावकऱ्यांना केली.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचाराला कालपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. काल तिन्ही प्रमुख गटांना निवडणूक चिन्हांचे वाटप झाल्यापासून प्रचाराने जोर पकडला आहे. श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचारासाठी पॅनल प्रमुख अभिजीत पाटील यांच्या मूळ गाव देगावात प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना अनेक गावकऱ्यांनी अभिजीत पाटील यांना साथ देण्याचे आवाहन केले तसेच सर्व गावकरी एकजुटीने अभिजीत पाटील यांच्या मागे उभे आहेत व त्यांचा विजय निश्चित होईल असा आशीर्वाद ही दिला.
- ज्या गावाला आजवर कधी संचालक पद नाही मिळालं त्या गावाचं पोरगं आज पॅनल प्रमुख झालंय- अभिजीत पाटील
आपल्या देगाव या गावाला विठ्ठल कारखान्याच कधीही संचालक पद मिळाले नाही आणि आज त्याच गावच पोरगं पॅनल प्रमुख झाल्याने सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले आहे अशी प्रतिक्रिया अभिजित पाटील यांनी व्यक्त केली यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले
मी सगळ्यात पहिल्यांदा उस्मानाबाद मधील धाराशिव कारखाना खरेदी केला होता. त्यावेळी तालुक्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांची ऊसासाठी कोंडी झालेली होती. त्यावेळी अडचण लक्षात घेऊन मी १२५ किमी अंतरावर ऊस गळपासाठी नेला आणि २३०० रुपये दर दिला मग यांना केवळ २५ किलोमीटर अंतरावर सगळा ऊस असताना २५०० रुपये दर द्यायला काय अडचण आहे? असा प्रश्न उपस्थित केला आपली सत्ता आल्यानंतर २५०० रुपये दर देण्याचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. तसेच मोठ्या मनाने सर्व गावकऱ्यांनी पाठीशी उभे राहण्याचे त्यांनी भावनिक आवाहन केले.
यावेळी देगांव मधील सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच उपस्थित ग्रामस्थांनी अभिजीत पाटील यांना टाळ्यांच्या कडकडाटात साथ देण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रा.बी.पी.रोंगे सर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सचिन पाटील, मा.सरपंच शांतीनाथ रणदिवे, सच्चिदानंद पाटील, काकासाहेब पाटील, ॲड. अर्जुन पाटील व रयत क्रांती संघटनेचे दीपक भोसले,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष सुभाष भोसले, काकासाहेब पाटील,
आदींसह ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.