जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगातील त्रुटी दूर कराव्यात- ग्राहक पंचायतीची मागणी
विविध मागण्यांचे निवेदन राज्य आयोगाला देण्यात आले

लोकपत्र न्यूज
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : राज्यातील सर्व ग्राहक तक्रार निवारण आयोगातील त्रुटी, समस्या दूर करण्यात याव्यात अशी मागणी अ.भा. ग्राहक पंचायतीने राज्य आयोगाच्या अध्यक्षांकडे निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती जिल्हा संघटक शशिकांत हरिदास यांनी दिली.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगातील (मंचाच्या) कामकाजात ग्राहकांना येणाऱ्या अडचणी,समस्यांबाबतचे निवेदन राज्य आयोगाचे अध्यक्ष संतोष काकडे यांची समक्ष भेट घेऊन देण्यात आले. या निवेदनात
जिल्हा आयोगामध्ये मध्यस्थाची नियुक्ती करणे, तसेच अधिकृत ग्राहक प्रतिनिधीची (Authorised consumer representative) नियुक्ती करणे,ऑनलाईन तक्रार दाखल करणे व त्याची सुनावणीसुध्दा ऑनलाईन व्हावी, त्यासाठीचे तांत्रिक मार्गदर्शन होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी, त्याचबरोबर सर्व जिल्हा आयोगासाठी पुरेसे संगणक, झेरॉक्स मशीन, स्टेशनरी, फर्निचर इ.साहित्य त्वरित उपलब्ध करुन देण्यात यावे, आयोगातील रिक्त सदस्य पदे, आस्थापनेवरील सर्व कर्मचारी, अधिकारी यांच्या रिक्त जागा प्राधान्याने तात्काळ भरण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
वरील अडचणींमुळे दाखल झालेल्या हजारो तक्रारी सध्या न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत तसेच पीडित ग्राहकांना न्याय मिळण्यासाठी विलंब होत आहे असेही निवेदनात म्हटले आहे.
ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार तक्रार दाखल झाल्यापासून ९० दिवसात न्याय मिळावा अशी तरतूद आहे मात्र अनेक त्रुटींमुळे ग्राहकाला या तरतुदीपासुन वंचित राहावे लागत आहे.तरी सर्व अडचणींची त्वरीत दखल घ्यावी अशी मागणी अ.भा.ग्राहक पंचायतीचे प्रांत सचिव भालचंद्र पाठक, सदस्य सुभाष सरदेशमुख, प्रांत शिक्षण विषय प्रमुख दीपक इरकल,जिल्हाध्यक्ष विनोद भरते, जिल्हा संघटक शशिकांत हरिदास,जिल्हा कोषाध्यक्ष सुहास निकते,यांनी केली असुन यावेळी जिल्हा कार्य. सदस्य राजशेखर अळगीकर,सोलापूर शहराध्यक्ष विश्वनाथ खटावकर, सदस्य गोविंद बासुतकर इ.उपस्थित होते.
बातमी व जाहिरात साठी संपर्क- दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com