सभासदांविषयी आस्था नव्हती म्हणूनच विठ्ठल कारखाना बंद ठेवला का?
युवराज पाटील गटाचा भगीरथ भालके वर हल्ला बोल

संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून ओळख असणाऱ्या विठ्ठल कारखान्याच्या सभासदांविषयी थोडीही आस्था नसल्यामुळेच विठ्ठल कारखाना बंद राहिला. सभासदांसाठी नॉट रिचेबल राहणारा चेअरमन आता सभासदांपुढे हात पसरत आहे. कारखान्याचा सौदा करावयास निघालेल्या या चेअरमनला युवराज पाटील यांच्यावर टीका करण्याचा अधिकार काय ? असा सवाल पटवर्धन कुरोली येथील प्रचार सभेत करण्यात आला. यावेळी युवराज पाटील,ॲड. दीपक पवार,गणेश पाटील आणि दीपक वाडदेकर यांनी भगीरथ भालके यांच्यावर जोरदार हल्ला चढविला
सभासदांसाठी आम्ही कधीही नॉटरिचेबल राहणार नाही-गणेश पाटील
तीन वर्षात दोन वेळा विठ्ठल कारखाना बंद राहिला. मागील दहा वर्षापासून संचालक असलेल्या भगीरथ भालके यांना हा कारखाना सुरू करता आला नाही. किंबहुना कारखाना खाजगी व्यक्तीच्या घशात घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. दुसरीकडे मात्र युवराज पाटील यांच्या माथी खापर फोडण्याचे काम आता ते करत आहेत. स्वतःला जे जमले नाही त्याच्यावर न बोलता दुसऱ्याला दोष देण्यात ते धन्यता मानत आहेत. सभासदांची देणी द्यावी लागतील याकरता ते कित्येक महिने नॉटरिचेबल राहिले आता बुडाखालील खुर्ची जाते की काय हे लक्षात आल्यावर सभासदांच्या समोर आले आहेत. सभासदांनी पाठीशी राहिल्यास आम्ही कधीही नॉटरिचेबल राहणार नाही अशी प्रतिक्रिया गणेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
तुम्ही विठ्ठल कारखान्यास निवडणुकीचे रणांगण बनवले-ॲड. दीपक पवार
आजपर्यंत प्रत्येक निवडणूक कारखान्याच्या जीवावर लढवली गेली. कारखान्याच्या अर्थकारणाचा विचार केला नाही. यामुळेच कारखाना डबघाईस आला. जिल्हा परिषद, विधानसभा, विठ्ठल कारखाना, यांसारख्या निवडणुका कारखान्याच्या जीवावरच लढल्या गेल्या. परिणामी कारखान्याचे अर्थकारण बिघडले यास फक्त तुम्ही आणि तुम्हीच जबाबदार आहात. युवराज पाटील यांच्यावर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार नाही अशी टीका ॲड. दीपक पवार यांनी केली.
सभासदांची दिशाभूल करू नका-युवराज पाटील
विठ्ठल कारखाना चालवताना २० लाख रुपयांचे सामान एक कोटी रुपयांचे दाखवायचे कारखान्याच्या जीवावर निवडणुका लढवायच्या यामुळे सीएंनी विठ्ठल कारखान्याची पत खालावली असल्याचा शेरा कारखान्यास दिला आहे. दोन वर्षे फिरून तुम्हाला सभासदांची देणी देण्यासाठी पैसा उपलब्ध झाला नाही. आता सभासदांसमोर टीका करून त्यांची दिशाभूल करू नका असा प्रहार युवराज पाटील यांनी भगीरथ भालके यांच्यावर केला.