विधानसभा रणांगणात वसंतराव देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राष्ट्रवादी आणि अपक्ष दोन उमेदवारी अर्ज दाखल; मात्र कार्यकर्त्यांच्या निर्णयावर घेणार भूमिका

संपादक – दिनेश खंडेलवाल
विधानसभा रणांगणात वसंतराव देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राष्ट्रवादी आणि अपक्ष दोन उमेदवारी अर्ज दाखल; मात्र कार्यकर्त्यांच्या निर्णयावर घेणार भूमिका
पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील दिग्गज राजकारणी म्हणून ओळखले जाणारे वसंत नाना देशमुख यांनी आज विधानसभेच्या रणांगणात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून शरदचंद्र पवार पक्षाकडून एक अर्ज तर एक अपक्ष असे दोन अर्ज त्यांनी आज भरले आहेत. पक्ष व अपक्ष असे दोन अर्ज भरल्यामुळे पंढरपूर मतदार संघात वेगळे चित्र पाहायला मिळणार असे बोलले जात आहे. दरम्यान कार्यकर्त्यांच्या निर्णयावरच भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काही दिवसापूर्वी शरद पवार यांची भेट घेऊन निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांनी विधानसभा लढवण्यासाठी कार्यकर्त्यांसह मोट बांधायला सुरुवात केली होती. दरम्यान आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आपण कार्यकर्त्यांशी तसेच मतदारसंघातील नागरिकांशी चर्चा करूनच निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यामागे तर्क वितर्क लावले जात आहे.
सहा महिन्यापूर्वी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कासेगाव येथे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी त्यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. त्यावेळीच त्यांनी यंदाची विधानसभा निवडणूक आपण लढवणार असल्याचे घोषित केले होते. उच्च न्यायालयाचे सरकारी वकील उज्वल निकम यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकला होता. तेव्हा पासून त्यांच्या उमेदवारीची चर्चा मतदारसंघात होत होती.
दरम्यान वसंतराव देशमुख यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी मिळाली तर निवडणूक लढवणारच मात्र नाही मिळाली तर कार्यकर्ते नागरिक व समर्थकांशी चर्चा करून विधानसभा लढवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.
वसंतराव दौलतराव देशमुख हे ज्येष्ठ राजकारणी आहेत. आजपर्यंत त्यांनी पंढरपूर पंचायत समिती, जिल्हा परिषद सोलापूर, पांडुरंग सहकारी साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती यासारख्या संस्थां आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे त्यांचा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. या जनसंपर्काच्या जीवावर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यास मतदारसंघात वेगळे चित्र निर्माण होऊ शकते असे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होताना दिसत आहे.