
संपादक – दिनेश खंडेलवाल
खग्रास चंद्रग्रहणामुळे श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या नित्योपचारात बदल
ग्रहण लागल्यापासून मोक्ष नंतर रात्री २ वाजेपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन सुरू राहणार
पंढरपूर(प्रतिनिधी):- खग्रास चंद्रग्रहण दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी असल्याने श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या नित्योपचारामध्ये बदल करण्यात येणार आहे. यादिवशी रात्री ९.५७ वा.ते १.२७ वाजेपर्यंत ग्रहणाचा कालावधी आहे. ग्रहणाचे वेध दुपारी १२.३७ वाजले पासून सुरू होत असल्याने दुपारचा पोशाख व धुपारतीच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही.
रात्री ९.५७ वाजता ग्रहण स्पर्श झाल्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस व मंदिरातील इतर परिवार देवतेस चंद्रभागा नदीचे पाणी आणून स्नान घालण्यात येणार आहे. तसेच ग्रहण सुटेपर्यंत म्हणजे रात्री १.३७ वाजेपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन सुरू राहणार आहे.
ग्रहण सुटल्यानंतर ग्रहण सुटल्याचे स्नान चंद्रभागा नदीचे पाणी आणून घालण्यात येणार असून, मोक्ष झाल्यानंतर रात्री २ वाजेपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन सुरू राहील व रात्री २ वाजेनंतर शेजारती करण्यात येणार आहे. शेजारतीनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची विश्रांती पहाटे ५ वाजेपर्यंत राहणार आहे. त्यामुळे दिनांक ८ सप्टेंबर रोजी काकड आरती पहाटे ५ नंतर सुरू होईल व त्यानंतर नेहमीप्रमाणे नित्यपूजा होऊन दर्शन सकाळी ६.३० वाजेपर्यंत सुरू होईल याची भाविक भक्तांनी नोंद घ्यावी असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.