दामाजी कारखान्याच्या कारभारावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांना सभासद धडा शिकवतील-आ. समाधान आवताडे
दामाजी च्या प्रचाराचा शुभारंभ माचनूर येथून केला

संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी आणि सभासद बांधवांच्या अर्थिक समृद्धीचा झरा असणाऱ्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान कारभारावर कोणतीही माहिती न घेता बिनबुडाचे आरोप करणाऱ्या असंतुष्ट राजकीय मंडळींना या निवडणुकीमध्ये सभासद त्यांना त्यांची जागा दाखवून धडा शिकवतील अशी गर्जना पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी तथा कारखान्याचे चेअरमन आमदार समाधान आवताडे यांनी केली आहे.
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक अनुषंगाने श्री संत दामाजी शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ माचणूर येथील सिद्धेश्वर मंदिर येथे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. यावेळी आयोजित सभेला संबोधित करताना आ. आवताडे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. पुढे बोलताना आ. आवताडे म्हणाले की, तालुक्याच्या सहकार क्षेत्राचा उपयोग केवळ आपले अर्थिक प्राबल्य मजबूत करण्यासाठी करणाऱ्यांनी आम्हाला सहकार शिकवणीचे डोस देण्याचा प्रयत्न करु नये.
गेल्या सहा वर्षात श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना कोणत्या मार्गांनी अडचणीत येईल ? कारखाना कसा बंद पडेल ? संकटाची नामुष्की कशी ओढवली जाईल ? अशा विविध पद्धतीने खटाटोप करणाऱ्यांनी कारखान्याचे गतवैभव रसातळाला नेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
विद्यमान संचालक मंडळ आणि चेअरमन यांच्यावर केवळ राजकीय सुडबुद्धीने आरोप करायचे असा एककलमी कार्यक्रम विरोधकांनी सूरू केला आहे. परंतु विद्यमान संचालक मंडळ आणि सभासद बंधूनी एकमेकांशी विधायक समन्वय ठेवून हा साखर कारखाना सुरळीतपणे चालविण्यासाठी आदर्शवत कार्यप्रणाली राबवली आहे. दामाजी कारखान्याची सद्य काळातील कारभाराची पारदर्शक वस्तुस्थिती पाहून आपला यामध्ये कोठेच मेळ बसत नाही हे ओळखून फक्त आरोप करायचे आणि सभासदांमध्ये संभ्रम निर्माण करायचा एवढेच विरोधकांच्या हातामध्ये शिल्लक राहिले आहे.
मंगळवेढा तालुक्याच्या शहर व ग्रामीण भागामध्ये अर्थिक, सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्राविषयी जाण आणि कारखान्याविषयी आस्था असणाऱ्या मंडळींना श्री संत दामाजी शेतकरी विकास आघाडी अंतर्गत उमेदवारी दिली गेली आहे. गेल्या सहा वर्षातील कारखान्याच्या कर्जाविषयी रक्कमांची सूज निर्माण करणाऱ्या विरोधकांना आ. आवताडे यांनी सखोल आकडेमोड सांगून विद्यमान संचालक मंडळाने पूर्वीच्या कर्जाचा डोंगर कसा कमी केला याची माहिती दिली.
केवळ राजकीय महत्वकांक्षा पूर्णत्वास नेण्यासाठी दामाजी कारखान्याचा उपयोग करणाऱ्यांनी तालुक्याच्या सहकार क्षेत्रासाठी आपले किती योगदान सिद्ध केले असा सवालही आ. आवताडे यांनी उपस्थित केला.
यावेळी प्रा. येताळा भगत, भाजपा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, नूतन संचालक अशोक केदार, माजी सरपंच विलास डोके यांनी आपले विचार मांडले. यावेळी माजी संचालक, सर्व उमेदवार, सभासद, शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन दिगंबर यादव यांनी केले तर आभार सिद्धेश्वर डोके यांनी मानले.