
संपादक – दिनेश खंडेलवाल
विठ्ठल मंदिरातील अनागोंदी कारभारावर नियंत्रण ठेऊन तात्काळ कारवाईची मागणी !

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील भ्रष्टाचारा बाबत जन आंदोलनाचा किर्तनकार ह.भ.प. डॉ. सुहास महाराज फडतरे यांचा इशारा

पंढरपूर(प्रतिनिधी):- अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत तसेच वारकरी संप्रदायाचे मूळ स्थान असलेले पंढरीचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये बऱ्याच दिवसापासून अनागोंदी प्रकार सुरू असल्याने अशा प्रकारांवर आळा बसावा यासाठी प्रशासनाने दखल घेऊन कारवाई करावी अन्यथा वारकरी भाविक भक्तांना सोबत घेऊन संत नामदेवाच्या पायरी पासून ते विधी व न्याय मंत्री तथा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर पंढरपूर पासून विठोबाचे मंदिर भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी दिंडी काढून आंदोलन करू असा इशारा नामदेव तुकाराम वारकरी परिषद महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. सुहास महाराज फडतरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्याध्यक्ष व सहअध्यक्ष यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आपणास निदर्शनास आणून देऊ इच्छितो की पंढरपूरचे विठ्ठल दैवत हे आम्हा तमाम वारकरी मंडळींचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरावर शासनाची समिती आम्हा वारकरी लोकांच्या सोयी साठी व सेवेसाठी नियुक्त केलेली असते. पण यामध्येच व्यवस्थापकाने उघड भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाले आहे.
![]()
तथाकथित व्यवस्थापकाला समितीने सक्तीच्या रजेवर पाठवले असताना व्यवस्थापक मनोज श्रौत्री यांना पुन्हा मंदिर समितीचा चार्ज दिल्याचे समजते. ज्या अधिकाऱ्यांनी श्री विठ्ठलाच्या तिजोरीवर डल्ला मारला आहे. अशा अधिकाऱ्यांना समितीने पुन्हा त्या पदावर बसवले असून हा अक्षम्य गुन्हा समितीने केला आहे.

पण भ्रष्टमुक्त समाज व्यवस्थेचे समर्थन केलेल्या व भ्रष्ट घटकांना वठणीवर आणण्याचे काम आमच्या वारकरी संतांनी केले आहे. त्याच विचारांचे आम्ही वारकरी निष्ठावान पाईक आहोत. त्यामुळे वारकरी संप्रदायाला अशा भ्रष्ट व पदच्युत व्यवस्थापकाला पुन्हा त्या जागेवर अधिकार देणे हे अजिबात मान्य नाही.

त्यांना त्या जागी बसवल्यास आम्ही शांत बसणार नाही. संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या वतीने वारकरी भाविक भक्तांना सोबत घेऊन संत नामदेवाच्या पायरी पासून ते विधी व न्याय मंत्री तथा मुख्यमंत्री यांच्या घरापर्यंत विठोबाचे मंदिर भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी दिंडी काढण्यात येणार आहे. या दिंडीच्या माध्यमातून विठ्ठलाच्या मंदिरात चाललेला भ्रष्टाचार बंद करण्यासाठी भाविकांना सुलभदर्शन मिळण्यासाठी मंदिरात चोऱ्या करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी झोपलेल्या मंदिर समितीच्या सदस्यांना जागे करण्यासाठी ही दिंडी निघणार आहे. याची दखल प्रशासनाने घ्यावी आणि संबंधित अधिकारी व समितीवर लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा या विरोधात संविधानिक व वारकरीपद्धतीने आंदोलन छेडले जाईल असा इशारा नामदेव तुकाराम वारकरी परिषद महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. सुहास महाराज फडतरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.


