कार्तिक यात्रेत वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज- उपविभागीय पोलीस अधिकारी-विक्रम कदम
3 हजार 524 पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड, 1 एसआरपीएफ तुकडी, 6 वॉच टॉवर

संपादक-दिनेश खंडेलवाल
कार्तिक यात्रेत वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज- उपविभागीय पोलीस अधिकारी-विक्रम कदम
3 हजार 524 पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड, 1 एसआरपीएफ तुकडी, 6 वॉच टॉवर
पंढरपूर : कार्तिक शुद्ध एकादशी 04 नोव्हेंबर 2022 रोजी असून, या कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येतात. वारीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षित व निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.
कार्तिक वारी कालावधीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले असून सुरक्षेसाठी व वाहतुक नियत्रंणासाठी 3 हजार 524 पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच होमगार्ड यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये 12 पोलीस उपअधिक्षक, 26 पोलीस निरिक्षिक, 187 सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षक, 2 हजार 31 पोलीस कर्मचारी व 1 हजार 268 होमगार्ड तसेच एक एसआरपीएफ कंपनीच्या तुकडी, 6 वॉच टॉवर तसेच 4 बीडीडीएस पथक नियुक्त करण्यात आले आहेत. वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नदीपात्र, 65 एकर, महाव्दार चौक, पत्राशेड, चंद्रभागा घाट, छत्रपती शिवाजी चौक या सहा ठिकाणी वॉच टॉवर करण्यात आले आहेत. तसेच नदीपात्रासह महाव्दारचौक,नगर प्रदक्षिणा मार्ग, मंदीर परिसर, 65 एकर आदी ठिकाणी 125 सीसीटीव्ही कॅमेरे मंदीर समितीच्या वतीने बसविण्यात येणार असल्याचेही उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी सांगितले.
वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये भाविकांना वाहुकीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जड वाहतुक शहराबाहेरुन वळविण्यात आली आहे. तसेच वाहतुक नियमनासाठी 12 ठिकाणी डायव्हरशन पॉईट सुरु करण्यात आले आहे. त्याचबरोबर खाजगी वाहनधारकांच्या वाहनांना थांबण्यासाठी 15 ठिकाणी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली असून या वाहनतळांवर सुमारे पाच हजार पेक्षा अधिक वाहने पार्क करण्याची क्षमता असल्याचेही श्री.कदम यांनी सांगितले. भाविकांनी तसेच नागरिकांनी सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी केले आहे.