
लोकपत्र न्यूज
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका व महानगरपालिका मध्ये काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना वारस हक्काने अर्ज केल्याच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत नियुक्ती देण्याचे आदेश पुन्हा एकदा निर्गमित केले असल्याने सफाई कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शासनाने नगरपालिका व महानगरपालिकेमधील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाड बर्वे मलकानी कमिटीच्या शिफारशीनुसार अर्ज केल्यानंतर ३० दिवसाच्या आत वारसाहक्काने नियुक्ती देण्याबाबत यापूर्वीच आदेश निर्गमित केले होते. परंतु नगरपालिका व महानगरपालिके मधील सफाई कर्मचारी च्या वारसाने वारसाहक्काने नोकरी मिळणे बाबत अर्ज केल्यानंतर आयुक्त तथा संचालक यांच्या दि. १९/९/२०१७ रोजी काढलेल्या आदेशानुसार वारसाहक्काने नियुक्ती देण्यापूर्वी सर्वसाधारण सभेची किंवा स्थायी समिती ची मंजुरी घेणे आवश्यक केले होते.
त्यानुसार नगरपालिकेमध्ये सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन किंवा महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीची मंजुरी घेऊनच सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती आदेश दिले जात होते. परंतु सर्वसाधारण सभा किंवा स्थायी समिती होण्यास दोन-दोन तीन-तीन महिने कालावधी लागत होता. त्यामुळे नगरपरिषद सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यासही विलंब होत होता.
यापूर्वी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांची ३० दिवसाच्या आत नियुक्ती करणे बंधनकारक असूनही केवळ सर्वसाधारण सभा व स्थायी समिती सभा यांची मंजुरी लवकर न मिळाल्याने नियुक्ती करण्यास विलंब होत होता.
ही बाब नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,नगर विकास विभागाचे सचिव व डॉ. किरण कुलकर्णी आयुक्त तथा संचालक नगर पालिका प्रशासन संचालनालय वरळी सह आयुक्त अनिकेत मानोरकर यांच्याशी वेळोवेळी झालेल्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेच्या वेळी महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने राज्याचे अध्यक्ष डॉ. डी एल कराड राज्याचे जनरल सेक्रेटरी सुनील वाळुजकर यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली होती. वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे अधिकार हे मुख्याधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना असल्याने सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना ३० दिवसाच्या आत नियुक्ती देण्याबाबत शासनाने आदेश निर्गमित करावेत अशी मागणी केली होती.
संघटनेने केलेल्या मागणीची दखल घेऊन शासनाने सफाई कर्मचारी यांच्या वारसाने अर्ज केल्यापासून ३० दिवसाच्या आत त्यांना वारसाहक्काने नियुक्ती करावी असे पुन्हा आदेश दिले असून वारसास नियुक्ती दिल्यानंतर कार्योत्तर मंजुरीसाठी सदरचा विषय सर्वसाधारण सभा किंवा स्थायी समिती समोर ठेवावा असे परिपत्रक काढण्यात आले असून या आदेशामुळे यापुढे सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्ती बाबत लवकरात लवकर न्याय मिळणार आहे. या आदेशामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. शासनाने या घेतलेल्या निर्णयाबद्दल महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीचे राज्याचे अध्यक्ष कॉ. डॉ. डी एल कराड राज्याचे जनरल सेक्रेटरी सुनील वाळूजकर व पुणे विभागाचे अध्यक्ष प्रा. ए बी पाटील यांनी सदर निर्णयासाठी शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.
बातमी व जाहिरात साठी संपर्क- दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com