पिण्याचा आणि शेतीचा पाणी प्रश्न;खंडित वीजपुरवठा बाबत पंढरीत शेतकर्यांचा आक्रोश
उद्या पंढरपूरात सर्व संघटना,पक्षीय,शेतकरी आक्रोश मोर्चा

संपादक-दिनेश खंडेलवाल
पिण्याचा आणि शेतीचा पाणी प्रश्न;खंडित वीजपुरवठा बाबत पंढरीत शेतकर्यांचा आक्रोश
उद्या पंढरपूरात सर्व संघटना,पक्षीय,शेतकरी आक्रोश मोर्चा
पंढरपूर : गेल्या अनेक दिवसापासून पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारल्याने शहराबरोबरच ग्रामीण भागातही पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत सरकारला निवेदन देऊन सांगूनही कोणतीच पावले उचलली जात नसल्याने आता या झोपलेल्या सरकारला जागे करूया आणि शेतकरी हितासाठी एकत्र येऊया अशी हाक देत सर्वपक्षीय मोर्चा काढण्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी उद्या विठ्ठल परिवार तसेच सर्व पक्षीय, संघटना यांचा आक्रोश शेतकरी मोर्चा दि.०४ सष्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पंढरपूर तहसील कार्यालय पर्यंत काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे.
पंढरपूर, मंगळवेढा तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव, सर्व संघटना, सर्व पक्षाचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते व सहकारी यांना जाहीर आवाहन करण्यात येते की आपल्या परिसरात अत्यंतअल्प प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पाण्याअभावी पिके करपू व जळू लागली आहेत. माणसांना व जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले आहे. तसेच चारा व नदीकाठच्या व कॅनॉलवर अवलंबून असणाऱ्या गाव-गावच्या पाणीपुरवठा व मोठ्या शहरांच्या पाणी पुरवठ्याच्या योजना देखील पाण्याअभावी बंद पडत आहेत. पाणी सोडण्याची मागणी करून पाणी सोडले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. वीज पुरवठा देखील खंडित केला जात आहे. शहरात सुध्दा एक दोन दिवसांआड पाणी पुरवठा होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत पक्ष पार्टीच्या पुढे जाऊन सर्व पक्षांनी सर्व संघटनांनी शेतकरी बांधवांनी शेतकरी हितासाठी यल्गार पुकारला आहे. या झोपलेल्या सरकारला जागे करूया आणि शेतकरी हितासाठी एकत्र येऊया.
यासाठी आपण सर्वांनी सहभागी व्हावे असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी आवाहन केले आहे.