राज्यसामाजिक

आषाढी यात्रेसाठी पंढरपूर नगपालिका प्रशासन सज्ज-मुख्याधिकारी अरविंद माळी

शहरात दररोज पिण्याच्या पाण्याची क्लोरीन टेस्ट केली जाणार

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरपूर : “झाडू संतांचे मार्ग करु पंढरीचा स्वर्ग” या ब्रीद वाक्य प्रमाणे पंढरपूर नगर पालिका प्रशासन आषाढी यात्रेसाठी सज्ज झाले आहे. आषाढी शुद्ध एकादशी 10 जुलै 2022 रोजी होणार असून आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी परराज्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातून सुमारे 10 ते 12 लाख भाविक येतात. येणाऱ्या भाविकांच्या व स्थानिक नागरिकांच्या आरोग्य सुरक्षितेच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली.

गेल्या महिनाभरापासून प्रशासनामार्फत शहरातील 65 एकर तसेच वाखरी येथील शौचालयांच्या दुरुस्त्या,इतर स्वच्छता करण्याचे काम सुरू असून वाळवंटामधून जवळपास 50 टन कचरा काढण्यात आला आहे. घाट कामाचे डेब्रिज साफ करण्यात आले आहे. पाणीपुरवठ्याच्या सर्व यंत्रणा सुस्थितीत करण्यात आले आहेत.

आषाढी यात्रा कालावधीत महिलांच्या स्वच्छतेच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरामध्ये वेगळ्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच महिलांच्या वैयक्तिक स्वच्छतेच्या अनुषंगाने नदी पात्र, वाळवंट परिसर, वाखरी पालखी तळ, 65 एकर व शहरातील सर्व सुलभ इंटरनॅशनल शौचालयमध्ये सॅनेटरी नॅपकिन वेडींग मशिन बसविणेत येणार आहे. भाविकांना स्वच्छ पिण्याचा पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी शहरातील सार्वजनिक बोरवेल, हातपंप आदी ठिकाणच्या पाण्याची तपासणी करण्यात आली आहे. तसेच दररोज पिण्याच्या पाण्याची क्लोरीन टेस्ट केली जाणार आहे.

आषाढी यात्रा कालावधीत शहरासह नदी पात्र, वाळवंट ,65 एकर परिसर ,पत्रा शेड, वाखरी पालखी तळ आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी 1350 स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून यामध्ये 350 कायम तर 1000 हंगामी कर्मचारी स्वच्छतेसाठी नेमण्यात आले आहेत. शहरासह 65 एकर, वाळवंट, पत्राशेड आदी ठिकाणी जंतनाशक फवारणीसह ,मँलेथॉन पावडर, ब्लिचिंग पावडर वेळोवेळी टाकण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत डम्पिंग ट्रॉल्या ,कॉम्पॅक्टर, कंटेनर, घंटागाडी, जेसीबी आदी वाहनांच्या माध्यमातून कचरा गोळा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रा कालावधीत या घंटागाड्या सकाळी व रात्री अशा दोन वेळेस घरोघरीचा कचरा गोळा करतील. दररोज 55 ते 120 टन इतका कचरा उचलण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रा काळात शहरातील व उपनगरातील सर्व मैदाने, नदी परिसर, 65 एकर भक्तिसागर, पत्राशेड दर्शनबारी रोजचे रोज स्वच्छ व निर्जंतुक करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी माळी यांनी दिली.

यात्रेकरुंच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाकडुन 65 एकर, नदी पात्र, पत्राशेड, मंदिर परिसर, वाखरी पालखी तळ या 5 ठिकाणी आपत्तीव्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली असून स्वच्छतेच्या व रात्रपाळीच्या कामासाठी जिल्ह्यातील इतर नगरपालिकांकडून 200 कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पत्राशेड, वाळवंट 65 एकर परिसर, रेल्वे मैदान आदी ठिकाणी 2000 तात्पुरते शौचालय उभारण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार त्यात वाढ करण्यात येणार असून. तात्पुरत्या शौचालयाच्या ठिकाणी पाण्याच्या टिपा ठेऊन त्यामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. वारकरी भाविकांनी उघड्यावर शौच विधी करू नये म्हणून प्रतिबंधक पथकांची नेमणूक देखील करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी माळी यांनी दिली.

सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील जीर्ण व धोकादायक इमारतींना नोटीसा देण्यात आल्या असून, शहरातील व वाळवंटातील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. वाहनतळावरती दिशादर्शक फलक लावण्यात आले असून, आवश्यक ठिकाणी बॅरेकेटींग करण्यात येणार आहे. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यासह प्रदक्षिणा मार्ग, दर्शन बारी येथील लाईट दुरुस्तीचे काम सुरु असून काही ठिकाणची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच 65 एकर येथे अखंडित व पुरेसा प्रकाश मिळावा यासाठी सात हायमास्ट दिवे चालू करण्यात आले आहेत. तसेच सार्वजनिक शौचलयातही लाईटची व्यवस्था करण्यात येत आहेत.

यात्रा कालावधीमध्ये येणाऱ्या भाविकांनी शौचालयाचा वापर करावा, सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळावा तसेच आरोग्य सुव्यवस्थीत राहण्यासाठी नगरपालिका प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही मुख्याधिकारी श्री. माळी यांनी यावेळी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close