पंढरीत मृगाच्या दमदार पावसाने जनजीवन विस्कळीत
गटारी तुंबल्या, नागरिकांच्या घरात शिरले पाणी, वाहने अडकली

संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरीत मृगाच्या दमदार पावसाने जनजीवन विस्कळीत
गटारी तुंबल्या, नागरिकांच्या घरात शिरले पाणी, वाहने अडकली
पंढरीच्या पुरस्कार प्राप्त नगरपालिकेचा पहिल्याच पावसात उडाला बोजवारा!
आरोग्य खाते झाले सुस्त, शहरातील समस्येबाबत घेतायेत गांधारीची भूमिका!
पंढरपूर :- पंढरपूर शहरांमध्ये मृग नक्षत्राच्या दमदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. शहराच्या अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागले. शहराच्या विविध भागांमध्ये गटारी तुंबल्या नालेसफाई न झाल्याने नागरिकांच्या घरांमध्ये, दुकानांमध्ये, बाजारपेठेत पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर शहरातील दोन्हीही रेल्वे पुलाच्या खालील बाजूस असलेल्या बोगद्यात पाणी साचल्याने एसटी बसेस सह चार चाकी, दोन चाकी वाहने अडकल्याने नागरिकांना पाण्यातून बाहेर येण्यासाठी आणि वाहने काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
पावसाळ्यापूर्वी शहरातील विविध भागात प्रशासना कडून नालेसफाई करणे गरजेचे होते परंतु ते न झाल्यामुळेच गटारी तुंबण्याचे प्रकार तसेच ब्रिटिश कालीन भदभदी (मोठ्या गटारी) भरून वाहू लागल्याने सखलभागातू मोठ्या प्रमाणात पाणी साचले. आणि नागरिकांना मृगाच्या दमदार पावसाने १९९३ च्या पूराची आठवण करून दिली.
शहरातील सरगम चौकाकडे जाणाऱ्या रेल्वे ब्रिज खाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने एसटी सह चार चाकी वाहने अडकून पडली होती. त्या ठिकाणी सुमारे दोन ते तीन फुटाच्या वर पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. याच पाण्यातून अडकलेली वाहने बाहेर काढण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागली तर आधी आत्मविश्वासाने दुचाकी वाहने नेणाऱ्यांनाही आपली वाहने बंद पडल्यामुळे ढकलतच बाहेर काढावी लागली. नेहमीचं येतो पावसाळा म्हणत या ठिकाणीही पावसाळ्यात नेहमीच असे वाहनधारकातून कसरत होताना पाहायला मिळते. परंतु प्रशासन यावर कोणताही तोडगा अथवा उपाय काढत नसल्याने शहरातून पालखी मार्गाकडे, इसबावी, कॉलेज चौक या भागाकडे जाणाऱ्या रहिवाशांसह वाहनधारकांना याचा मनस्ताप व नाहक त्रास होताना दिसतो.
शहरातील गजानन महाराज मठाच्या मागील बाजूस माळी गल्ली, जुनी पेठ, बाजारपेठ या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने हे पाणी दुकानात, नागरिकांच्या घरात, गोडाऊनमध्ये शिरले यामुळे नुकसानापासून वाचण्यासाठी सर्वांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले. मृगाच्या दमदार पावसाने विविध ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले.
तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या नगरपरिषदेने मुख्याधिकारी बापट असताना शहरातील ब्रिटिशकालीन मोठ्या गटारी नाले यांची साफसफाई केली होती. त्याचबरोबर शहराच्या विविध ठिकाणी साचणारा कचरा गोळा करून नागरिकांना आवाहन केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या आरोग्य खात्याच्या कामामुळे पंढरपूर नगर परिषदेला पहिला पुरस्कार राज्य शासनाकडून मिळाला परंतु शहरात झालेल्या मृगाच्या पावसाच्या पहिल्याच दणक्याने नगरपालिकेच्या कामाचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले. ]
तीर्थक्षेत्र पंढरपूर मध्ये भरणाऱ्या मोठ्या दोन आणि सामान्य दोन अशा चार यात्रा भरतात परंतु यात्रा महीनाभरांवर आलेली असताना यात्रेच्या नियोजनाचे बैठका प्रशासनाकडून सुरू असतानाही शहरांमध्ये अनेक ठिकाणी नालेसफाई झाली नाही. अनेक गटारी बुजले आहेत, तर कित्येक गटारी तुंबलेल्या दिसून येतात. यामुळे पाणी गटारीतून वाहून न जाता रस्त्यावर येते आणि रस्त्यातील पाणी सर्वसामान्य नागरिकांच्या घरात पोहोचते. या सर्व प्रकारामुळे पंढरपूर नगर परिषदेचे आरोग्य खाते या सर्व कारभाराकडे गांधारीच्या भूमिकेने पाहत असते की काय असा प्रश्न सर्वसामान्यातून उपस्थित केला जात आहे. यामुळे आरोग्य खाते सुस्त झाल्याचे पाहायला मिळतेय.]