पंढरपूरचे दगडूशेठ घोडके सोलापूर लोकसभा अपक्ष लढवणार
कोणत्याही पक्षावर विश्वास नसल्याने जनतेच्या मागणीमुळे अपक्ष लढणार- दगडूशेठ घोडके

संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूरचे दगडूशेठ घोडके सोलापूर लोकसभा अपक्ष लढवणार
कोणत्याही पक्षावर विश्वास नसल्याने जनतेच्या मागणीमुळे अपक्ष लढणार- दगडूशेठ घोडके
पंढरपूर : सोलापूर ४२ राखीव लोकसभा मतदारसंघातून पंढरपूरचे दगडूशेठ घोडके हे अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असून कोणत्याही पक्षावर आपला विश्वास नसल्याने समाज आणि जनतेच्या मागणीनुसार कोणत्याही पक्षातून निवडणूक न लढवता आपण ही निवडणूक अपक्ष लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून कोणत्याही प्रकारचा विकास झाला नाही. अनेक प्रलंबित प्रश्न या मतदारसंघात आहेत. परंतु ते प्रश्न आजपर्यंत सुटले नाहीत. ते प्रश्न सोडवण्यासाठी मी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अपक्ष लढवित आहे.
माझ्या पाठीशी सोलापूर मतदार संघातील जनता, माझा वडार समाज आहे. मी मुळचा मजरेवाडी येथील रहिवाशी असून त्या ठिकाणी शंभर बाय शंभर चे मंदिर उभारले आहे. मंदिराचा जिर्णोद्धार आणि यात्रेच्या दरम्यान समाज बांधवांनी सांगितले की काहीही करा ‘आण्णा’ परंतु या वेळेस निवडणुकीत आपण उभा रहावे. मी म्हणालो निवडणुकीला पैसा लागतो कुठून आणायचा पैसा तर समाज बांधवांनी जनतेनी सांगितले आम्ही वर्गणी काढू ,खर्च भागवू, आमच्या गाड्या, आमचा खर्च, तुम्ही खर्च करु नका, परंतु आपण ही निवडणूक लढवा. माझी इच्छा नसतानाही जनतेच्या मागणीमुळे खेड्यापाड्यातील समाज बांधवांमुळे मी ही निवडणूक लढवत आहे. असे दगडूशेठ घोडके म्हणाले.
मी सन १९९८ साली पंढरपूरचा नगराध्यक्ष असताना हरिद्वारच्या धरतीवर शहराचा विकास करण्यासाठी ५० लाखाचे इस्टिमेट तयार करून एलईडी कंपनीला रक्कम अदा केली. परंतु आज पर्यंत ते काम झाले नाही तसेच पडले आहे. या मतदारसंघातील जनता माझ्या पाठीमागे असल्यामुळे मला पूरक असे वातावरण आहे. अनेक ठिकाणी जनता म्हणते तुम्ही येऊ नका प्रचारापासूनची सर्व यंत्रणा आम्ही स्वतः राबवतो त्यांच्या या आग्रहामुळे मी अपक्ष निवडणूक लढवणार आहे.
सध्या राज्यात आणि देशात प्रत्येक वस्तू वापरण्यापूर्वी जीएसटी भरावा लागतो. जेवण करायच्या अगोदर जीएसटी भरावे लागते ही वस्तुस्थिती आहे . सर्वसामान्य जनतेवर अन्यायकारक असलेली जीएसटी बंद करणार. राज्यातील जनता या सरकारच्या धोरणावर नाराज आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला पंढरपूर एमआयडीसीचा प्रश्न आजही सुटलेला नाही. या मतदारसंघातील आणि पंढरपूर शहर तालुक्यातील नवयुवकांना रोजगार मिळत नाही. मोठे उद्योगधंदे या ठिकाणी नाहीत. या ठिकाणी निवडून आलेले खासदार,आमदार यांनी काय केले? असा प्रश्न उपस्थित करत याचा विचार होणे गरजेचे असल्याचे घोडके यांनी सांगितले.
सोलापूरचे आराध्य दैवत सिद्धेश्वर मंदिराच्या समोरील तलावातील पूर्ण गाळ त्यावेळी मी काढला स्वच्छ केले. त्या ठिकाणी काँक्रीट करायचे काम पूर्ण करायचे होते. परंतु अद्यापही ते काम झाले नाही. या कामासाठी वेळ पडल्यास मी दिल्ली येथे उपोषण करणार आहे. कारण कोणत्या पक्षाकडून ही कामे पूर्ण होणार नसल्याने मी स्वतः अपक्ष उभारण्याचा निर्णय घेतला असून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आणि अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी माझी उमेदवारी असणार असल्याचे दगडूशेठ घोडके यांनी सांगितले.