सभासदांच्या पैशातून उभे राहिलेल्या हॉस्पिटलचा तुम्ही धंदा केला;मात्र तुम्ही सवलत किती जणांना दिली?-अभिजीत पाटील
सोनके व सुस्ते येथे मोठ्या संख्येने सभासदांची उपस्थिती

संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : “ज्या शेतकरी सभासदांच्या जिवावर विठ्ठल हॉस्पिटल उभे राहीले त्यांना सवलतीत उपचार न देता तुम्ही त्याचा केवळ धंदा करून ठेवलाय.? औदुंबर अण्णांनी ज्या भावनेने विठ्ठल हॉस्पिटल उभा केले होते ती भावना तुम्ही जपली नाही. मला म्हणता हॉस्पिटल चालू केले आणि बंद केले. मी कोरोना काळात ते हॉस्पिटल केवळ लोकांच्या सेवेसाठी सुरू केले होते. मी डॉक्टर नाही तो माझा व्यवसाय नाही. लोकांना कोरोना काळात बेड,ऑक्सिजन मिळावा म्हणून मी ते हॉस्पिटल सूरू केले होते. तुम्ही कोरोना काळात किती लोकांना मदत केली ते सांगा. हॉस्पिटलमधल्या बाभळी तुम्हाला काढणं होईना तुम्ही कारखाना काय चालवणार असा घणाघात अभिजीत पाटील यांनी युवराज पाटील यांचे नाव न घेता केला. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने सोनके व सुस्ते गावात बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.
कारखाना कुणी अडचणीत आणला? तो बाहेर काढण्यासाठी काय उपाय केला आहे ह्यावर बोलण्याची सध्या गरज आहे. कारखाना कसा सुरू करणार यावर सध्या बोलण्याची गरज आहे.मात्र काहीजण निवडणूक दुसऱ्या प्रश्नाकडे भरकटत घेऊन जात आहेत.अण्णांचे नातू म्हणवून घेणारे १२ वर्षे संचालक मंडळात असताना बकोल ची मिल भंगारात विकली गेली. याची जबाबदारी कुणाची आहे?अण्णांच्या काळातली ती मिल विकली जात असताना नातू कुठे होते?का तुम्ही त्यावेळी विरोध केला नाही? वार्षिक सर्वसाधारण सभेत त्याला विरोध का केला नाही? शेतकऱ्यांना त्याची माहिती का दिली नाही? तुम्ही त्याचवेळी राजीनामा का दिला नाही? कारखाना जप्तीची नोटिस कुणी आणली? तुम्ही संचालक मंडळात होता. त्यावेळी तुमच्यामुळेच जप्ती आली तुमची कारखाना थकीत घालवला,तुमच्यामुळे ही वेळ आली आहे. तुम्ही कुठल्या मढ्यावरच लोणी खाताय असा घणाघात अभिजीत पाटील यांनी युवराज पाटील यांचे नाव न घेता केला.
दोन वर्षे चेअरमन नॉट रीचेबल होता,त्यावेळी कुठला वारसदार शेतकऱ्यांची बाजू घेऊन आला? किती जणांचे ऊस त्यांनी घालवले. विठ्ठल बंद असताना आपण स्वतः सांगोला साखर कारखाना धाडसाने चालू करून ६४०० लोकांचा ऊस आपण गाळप केला.दोन वर्षांपूर्वी देखील कारखाना बंद असताना आपण १५० अंतरावर धाराशिव कारखान्याला ऊस नेऊन गाळप केला.यापुढे देखील कुठल्याही शेतकऱ्याला कसलीही अडचण येऊ देणार नाही.कुठल्याही अडचणीसाठी हा अभिजीत पाटील उभा असेल अशीही ग्वाही त्यांनी दिली.यावेळी शेकडो सभासद शेतकरी उपस्थित होते.
यावेळी सोनके व सुस्ते येथील सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.